आपण सगळ्यांनी बघितलेला हा अनअकॅडमीचा व्हिडिओ म्हणजे निव्वळ फालतुगिरी. खेळातून एवढा अभ्यास शोधणं ही कल्पना खरंच उत्तम आहे, पण खरं सांगा हे प्रॅक्टिकली कुठे अस्त का ओ. कोण असा तुमच्यापैकी तरी आहे का, की जो आयपीएल मधून विज्ञान शिकतो. आज अनेक शिक्षण प्रेमी व्यक्ती किंवा शिक्षक सरळ सांगतात की क्रिकेट बघू नका कारण त्यातून तुमचा वेळ हा फक्त वाया जातो, पण अशा क्रिकेटच्या आयपीएल साठी एखादी शैक्षणिक संस्था करोडो रुपये देऊन स्पॉन्सर बनते तिथे देशाची होणारी हानी जाणवते.
एखादा खेळ मनोरंजन म्हणून बघणं काहीच गैर नाही, पण मनोरंजनाला सुद्धा प्रमाण असत हेच सगळे विसरतो. ह्या आयपीएल मधून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या हे मात्र खरं.
आज कोरोना सारख्या परिस्थिती मध्ये अनेक छोट्या मोठ्या संघटना किंवा व्यक्ती गरजूंना जितकी शक्य असेल तितकी मदत करत होती पण लोकांना ह्याची किंमतच नाही, प्रत्येकाच्या स्टेटसला फक्त झळकत होते आयपीएल चे वारे. धोनीच्या छोट्याशा मुलीवर अश्लील टीका कोणीतरी केली तर लाखो देशवासीय पेटून उठले आणि त्या नराधम्याला जेल मध्ये बसवल, पण हाथरस घटनेचं नंतर काय झालं ह्याकडे सगळ्यांनी मस्तपैकी पाठ फिरवली. प्रत्येकाला खेळाडूंचे रेकॉर्ड पाठ होते(असतात) लाईव्ह स्कोअर प्रत्येक जण स्टेटस ला टाकून दाखवत होता पण ह्याच वेळी जगात लॉकडाऊन मुळे निसर्गात झालेल्या सकारात्मक बदलांबाबत बोलण्यात कोणाला वेळच नव्हता , कधीही न दिसणारे पक्षी शहरात सुद्धा दिसू लागले प्रदूषणात घट झाली , ओझोन लेयर ने पुन्हा नवी उमेद पकडली, पंजाब मधून कधीही न दिसणारा हिमालय दिसू लागला ह्याची अनमोल किंमत कुणाला जाणवली सुद्धा नाही ,पण करोडो रुपयांची स्वतःच्या संपत्तीत भर टाकणाऱ्या खेळाडूंचा आम्हाला जास्त पुळका. कृणाल पांड्याचा एक मज्जेशिर व्हिडिओ सगळीकडे लगेच व्हायरल होतो पण ह्याच आयपीएल दरम्यान किती सैनिक शहीद झाले ह्याचा साधा सुगावा सुद्धा नाही कुणाला. आज करोडो भारतीय बेघर झाले ह्या महामारी मुळे , पण अशा परिस्थिती मध्ये सुद्धा खेळाडू ,एसी हॉटेल रूम्स, वॅनीटी व्हॅन्स, हॉलिडे बीचेस एन्जॉय करत होते. मॅच हरो अथवा जिंको पैशांचा पाऊस तिकडे पडत होताच. जेव्हा भारत मंदिकडे वाटचाल करत होता त्याच क्षणी हे सर्वजण आपल्या सारख्या बेजबाबदार प्रेक्षक वर्गामध्ये करोडो रुपयांच्या बोलीत खेळत होते.देशभर मुंबई फॅन विरुद्ध चेन्नई फॅन तसेच कोहली चांगला की धोनी की शर्मा हे वाद गल्लोगल्ली दिसत होते मात्र आर्थिक मंदी ला कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत ह्यात वाद विवाद सोडा साधी चर्चा पण कुठे नाही. प्रत्येकाच्या इंस्टा पोस्ट ला हार्दिक पांड्या , विराट कोहली यांच्या वाढदिवसांच्या शुभेच्छांचे मेसेज(टॅग सह) होते पण ह्याच कालावधीत भारतरत्न सी. वी. रमन, होमी भाभा, सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंत्या होऊन गेल्या ह्याबद्दल कानाडोळा झाला.
२०११ चा वर्ल्ड कप कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकला आणि आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स ने किती वेळा ट्रॉफी जिंकली हे शेंबड्या पोराला पण माहीत आहे पण हल्लीच २०१९ मध्ये झालेल्या चांद्रयान २ मधले प्रसिद्ध झालेले जे शास्त्रज्ञ होते त्यांचं नाव कुणाच्या लक्षात आहे. आज देशातल्या कोणालाही १० क्रिकेट खेळाडूंची नावे विचारा, तुम्हाला १०० खेळाडूंची नावे सांगेल. पण १० आत्ता असलेल्या शास्त्रज्ञांची नावे विचारा, सांगणार लाखात फक्त एकच सापडणार, ह्यात शंका नाही. लोकमान्यांच्या भाषेत सांगायचं झालं तर हेच आहे आपल्या देशाचं दुर्दैव.
महाराष्ट्रातील अनेक जण मुंबई महाराष्ट्राची आहे आणि रोहित महाराष्ट्रीयन आहे म्हणून मुंबई इंडियन्स ला पाठिंबा देत होते, पण खेळणारे हे फक्त प्यादी आहेत आणि त्यांना विकत घेऊन खेळवणारा हा गुजराथी अंबानी आहे ह्याच काय. आपण आज अशा अल्प गोष्टीत संतुष्ट राहतो इथेच चुकतं. आज अनेक ठिकाणी परदेशात, भारतीय वंशाचे नागरिक उज्ज्वल यश प्राप्त करतात, आणि आम्ही ते भारतीय वंशाचे असल्याने स्वतःची पाठ थोपटून घेतो. पण हेच भारतीय वंशाचे लोक, भारताचे नसून भारतीय वंशाचे असतात, त्यांचं नागरिकत्व हे भारतीय नसत आणि सगळ्यात खेदजनक म्हणजे, ते यश प्राप्त करतात, कारण ते भारतात वाढलेले नसतात. भारतात बॉलिवुड , क्रिकेट आणि राजकारण ह्यांना खऱ्या गरज असलेल्या क्षेत्रांपेक्षा अनन्यसाधारण महत्त्व आपणच देऊन ठेवलं आहे.
मी आयपीएल न बघता फक्त स्टेटस बघून कळलेल्या गोष्टींवरून अनेक आयपीएल moments(विरोधाभास) तुमच्या समोर मांडल्या, तुम्हाला सुद्धा अशा अनेक गोष्टी जाणवल्या असतील त्या तुम्हीही मांडा, प्रवाहा विरुद्ध बोलणं म्हणजे चुकीचं असतंच असं नाही...काय माहीत आपले मुद्दे सगळ्यांना पटले तर प्रवाह सुद्धा बदलेल.